ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९- अयशस्वी लिव्ह इन रिलेशनमुळे बलात्कारचे प्रमाण वाढत आहे असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली हायकोर्टाने मांडले आहे. तरुणाई कोणताही विचार न करता एकमेकांशी नातेसंबंध निर्माण करत असल्याने काही काळाने त्यांच्यात ब्रेक अप होते असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे.
दिल्लीतील एका तरुणीच्या प्रियकराची तिच्या वडिल व अन्य चौघा नातेवाईकांनी हत्या केली होती. या चौघांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाचे न्या. कैलाश गंभीर आणि न्या. सुनिता गुप्ता यांच्या खंडपीठाने हे परखड मत नोंदवले आहे. हायकोर्ट म्हणाले, तरुणाईने विशेषतः तरुणींनी आणखी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. लग्न किंवा लिव्ह इनसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मुलामुलींनी परिपक्वता दाखवणे गरजेचे आहे.
बलात्काराचे प्रमाण वाढण्याचे कारण याविषयी हायकोर्ट म्हणते, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तरुणाईने बेजबाबदारपणे निर्णय घेतल्याने काही काळाने हे संबंध तुटतात. ब-याचदा शारिरीक संबंधांनतर नातेसंबंध संपुष्टात येतात. पालकांनीही संवेदनशीलपणा आणि परिपक्वता दाखवत याकडे बघितले पाहिजे. एकमेकांवरील विश्वास, समजूतदारपणा आणि सहनशीलता या आधारेच या मुद्द्यावर तोडगा काढणे शक्य आहे असे कोर्टाने नमूद केले. संबंधित प्रकरणात तरुणीच्या नातेवाईकांनी हाच समजूतदारपणा दाखवला असता तर आज एका तरुणाचा मृत्यू झाला नसता व मुलीच्या नातेवाईकांनाही तुरुंगवास घडला नसता असे न्यायालयाने सांगितले.