नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणूक जनतेच्या अपेक्षांची निवडणूक होती. अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच भाजपाच्या मुख्यालयात आले. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लोकसभा निवडणूक देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी २१ व्या शतकातील निर्णायक घटना असल्याचे सांगून भाजपा सरकारने सामान्य नागरिकांच्या हितासाठी निष्ठेने काम केल्यास देशातील जनता त्यांच्याशी कधीही नाते तोडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील जनता १९६७ मध्येच काँग्रेसमुक्त झाली होती. परंतु त्यानंतर झालेला प्रयोग फसल्याने निराश होऊन परत काँग्रेसकडे वळली, असेही मोदी म्हणाले. जनता आपल्यापेक्षा दहा पावले पुढे आहे. त्यांच्या बरोबरीने कसे चालावे, आपली वागणूक कशी असावी हे बघणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचा आपल्याप्रति विश्वास वाढीस लागेल. यापूर्वीच्या निवडणुकीत राजकारणापेक्षा जातीय समीकरणांची चर्चा होत असे. परंतु ही पहिली निवडणूक आहे, ज्यात जातीय, भौगौलिक व इतर परंपरागत समीकरणांना दूर सारून जनतेने जनादेश दिला, असे ते म्हणाले. ही निवडणूक जनतेच्या अपेक्षांची होती. हीच प्रेरणा आणि अपेक्षा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेला जोडत होती. त्यामुळे जनतेच्या अक्षेपांची पूर्ती करण्याची सरकार आणि भाजपाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. परिश्रम घेण्यात कुठेही कमी पडून नका. आमचे निर्णय सामान्य नागरिकांचे भले करण्याच्या दिशेने आहेत. संपूर्ण निष्ठेने काम केल्यास जनता आपल्याशी नाते तोडणार नाही, याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अपेक्षापूर्ती केली तर जनता डोक्यावर घेईल !
By admin | Updated: June 2, 2014 05:46 IST