ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. २ - भरघोस मताधिक्याने निवडून देणा-या वाराणसीला हायटेक शहर बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नात माकडांनी विघ्न आणले आहेत. गंगा नदीकिनारी टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबल्स या माकडांनी तोडून टाकल्याने सरकारी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. या समस्येवर तोडगा काढायचा कसा असा सवाल सरकारी अधिकारी उपस्थित करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी टेक्नोसेव्ही म्हणून प्रसिद्ध असून मोदींना देशभरात तंत्रज्ञान क्रांती घडवायची आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात मोदींनी वाराणसी या त्यांच्या मतदार संघातून केली आहे. वाराणसी हे धार्मिक शहर म्हणून या शहराला सुमारे ३ हजार वर्षांची परंपरा आहे. वाराणसीमध्ये अनेक मंदिरही आहेत. वाराणसीत देवदर्शन केल्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. याशिवाय वाराणसीतील मंदिर परिसरात माकडांचा मुक्तसंचार असून भाविक या वानरांची पूजा अर्चाही करतात. या सर्व गोष्टी आता मोदींच्या हायटेक स्वप्नात अडथळे आणत आहेत. शहरातील अनेक मंदिर असून या मंदिरांना अन्य ठिकाणी हलवणे अशक्य आहे. याशिवाय शहरातील माकडांचा मुक्तसंचारही सरकारी यंत्रणांसाठी तापदायक ठरत आहे. आम्ही केबल वायर टाकल्या की माकडं त्या वायरी तोडून देतात. दर दोन महिन्यांनी आम्हाला केबल वायर तुटल्याच्या तक्रारी येत असतात अशी माहिती वाराणसीची कम्यूनिकेशन इंजिनियर ए.पी. श्रीवास्तव यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. माकडांना पकडण्याचा प्रयत्न केला तर स्थानिकांच्या भावना दुखावतात अशी व्यथाही एका अधिका-याने बोलून दाखवली.
वाराणसीची लोकसंख्या २० लाखांहून अधिक असून शहरातील बांधकाम नियोजनबद्ध पद्धतीने झालेले नव्हते. यामुळे शहरात जमिनीखालून केबल वायर टाकणे अशक्य आहे असे श्रीवास्तव यांनी नमूद केले. याशिवाय शहरात उन्हाळ्याच्या दिवसांत चार - चार तास वीज नसते. वीज नसल्याने सार्वजनिक ठिकाणी वाय फायची सुविधा देण्यात अडथळे येतात असा दावाही त्यांनी केला आहे.