उस्मानाबाद : डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नावानेच उस्मानाबादची ओळख निर्माण झाली होती. सहा वेळा विधानसभा आणि सरत्या लोकसभेत असे पस्तीस वर्षे उस्मानाबादचे प्रतिनिधीत्त्व करणार्या पाटील यांना या निवडणुकीत प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला आहे. वैयक्तिक जनसंपर्क आणि विकास कामांवर भर दिल्यानंतरही मोदी लाटेत राष्टÑवादी हक्काचा बालेकिल्ला राखू शकली नाही. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर १९५१ पासून डाव्या विचारसरणीचा पगडा आहे. १९५१ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली होती. हाच सिलसिला मागील अनेक वर्ष कायम होता. त्यानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांचेच जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व राहिले. मागील विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव झाला. हे अपयशही राष्टÑवादीने गांभिर्याने घेतले होते. त्यानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही मतदारसंघात दांडगा जनसंपर्क ठेवला होता. विशेष म्हणजे, शहर पाणी पुरवठा योजनेसह इतर विकास कामांतही त्यांचा लक्षवेधी सहभाग राहिल्याने याही निवडणुकीत डॉ. पाटील लोकसभेचा गड राखतील, असाच अंदाज प्रचाराच्या प्रारंभी वर्तविण्यात येत होता. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचाही राष्टÑवादीला फायदा होईल. तसेच भाजपाचे रोहन देशमुख यांची बंडखोरीही राष्टÑवादीच्या पथ्यावर पडेल, असा कयास लावला जात होता. मात्र, या दोन्ही मात्रा निवडणूक निकालानंतर कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, अंतिम टप्प्यात शिवसेनेतील नाराज पदाधिकार्यांची समजूत घालून त्यांना प्रचारात सक्रिय करण्यात सेना पदाधिकार्यांना यश आले. नेमके याउलट चित्र आघाडीमध्ये दिसून आले. प्रारंभी राष्टÑवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसणार्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेवटच्या क्षणी विरोधकांशी हातमिळवणी केली. याचा मोठा फटका राष्टÑवादी काँग्रेसला सोसावा लागला. याबरोबरच जिल्ह्याबाहेरील असलेल्या औसा आणि बार्शी हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने राष्टÑवादी पराभूत झाली.
मोदी लाटेने मोडली पस्तीस वर्षांची परंपरा
By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST