मुंबई : उद्योगपती वाडिया कुटुंबीयांना आलेल्या धमकी प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करत आहेत. ज्या फोनवरून एसएमएस आला तो इराणचा असावा, असे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाल्याची माहितीही मारिया यांनी दिली. फोनवर संभाषण सुरू असताना वाडियांकडून ज्या कोणी हे फोन घेतले त्यांनी ते रेकॉर्ड केलेले नाहीत. जर हे संभाषण रेकॉर्ड केले असते तर कदाचित गुन्हे शाखेच्या दफ्तरी रेकॉर्ड असलेला रवी पुजारीचा आवाज आणि फोनवरून पुजारी अशी ओळख सांगून बोलणाऱ्याचा आवाज पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविता आला असता, असे एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. मात्र संभाषण रेकॉर्ड नसल्याने गुन्हे शाखेने याआधी रेकॉर्ड केलेले आवाज, संभाषण वाडिया कुटुंबीयांना ऐकविले जाण्याची शक्यता आहे. त्यातून कदाचित वाडिया कुटुंबीय फोनवरून धमक्या देणाऱ्याचा आवाज ओळखू शकतील आणि त्याची ओळख पटू शकेल.गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संध्याकाळी वाडिया कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची सविस्तर तक्रार समजावून घेतली. फोन कधी आले, कोणाच्या मोबाइलवर आले, कोणत्या नंबरवरून आले, धमकी देणाऱ्याने स्वत:चे नाव काय सांगितले, तो पुढे काय बोलला हे सारे तपशील अधिकाऱ्यांनी समजावून घेतले. दरम्यान, नस्ली यांचे पुत्र नेस वाडिया यांच्याविरोधात प्रीती झिंटाने विनयभंगाची तक्रार केली. त्यावरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी नेस यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला. या पार्श्वभूमीवर वाडिया यांना धमक्या देणाऱ्याने प्रीतीची बाजू घेतली. त्याने प्रीतीला आणखी छळलेत, तिला त्रास दिलात तर तुमचा उद्योग उद्ध्वस्त करू, ठार मारू, अशी धमकी वाडिया यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत मारिया यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले.प्रीती आठवडाभरात परतणारआठवडाभरात मुुंबईला परतून पुरवणी जबाब देण्यास तयार असल्याचा निरोप प्रीतीने वकिलामार्फत दिल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. नेस वाडिया यांच्याविरोधात प्रीतीने दाखल केलेल्या तक्रारीचा तपास मरिन ड्राइव्ह पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
वाडिया कुटुंबाला आलेल्या धमकीचा मेसेज इराणवरून
By admin | Updated: June 19, 2014 02:55 IST