जयशंकर गुप्त, नवी दिल्लीबलात्काराचा आरोप असलेले केंद्रीय रासायनिक खत राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारवर दबाब वाढला आहे. मेघवाल प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारची कोंडी केली असताना केवळ न्यायालयाने समन्स बजावल्याने एखाद्याला गुन्हेगार ठरविणे योग्य नसल्याचे पक्षातील एका गटाचे म्हणणे आहे. मेघवाल यांना हटविल्यास विरोधकांपुढे नमते घेण्यासारखे होईल, अशी या गटाची भूमिका आहे. मेघवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली काँग्रेसच्या महिला आघाडीने भाजपा मुख्यालयावर मोर्चा काढला. दुसरीकडे पक्षाचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्यातील आरोपी आणि न्यायालयाने समन्स बजावलेली व्यक्ती सरकारमध्ये आहे, ही शरमेची बाब आहे, असे टीकास्त्र चाको यांनी सोडले. सरकार आता कायदेशीर प्रक्रियांचे पालन करीत असल्याचे सांगत आहे. हे अतीच झाले. अशा मंत्र्याला सरकारमध्ये एक क्षणही राहू देता कामा नये. सरकारने याप्रकरणात नैतिकतेच्या आधारे कारवाई करावी. राजकीय फायदा-तोट्याचे गणित पाहू नये, असा टोलाही चाको यांनी लगावला. काँग्रेसच्या महिला आघाडीप्रमुख शोभा ओझा यांनी मेघवाल यांच्यावरून मोदी यांच्यावर निशाना साधला. राजस्थानमधील पीडित महिलेला धमकवण्यात येत आहे. मेघवाल मंत्रिपदावर असेपर्यंत संबंधित महिला दडपणाखाली राहील, असे ओझा म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत कठोर कारवाईची भाषा करतात. पण सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात आले. तेव्हा ना मेघवाल यांनी राजीनामा दिला. ना पंतप्रधानांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मेघवाल यांना हाकला; मोदींवर वाढता दबाव
By admin | Updated: June 19, 2014 03:13 IST