नवी दिल्ली : एमबीबीएस डॉक्टरांना व्यवसायाचा परवाना आणि पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश देण्यापूर्वी त्यांची देशपातळीवर एक स्वतंत्र परीक्षा (एक्झिट एक्झाम) घेण्याचा विचार आरोग्य मंत्रालय करीत आहे.जे विद्यार्थी ही निर्णायक परीक्षा उत्तीर्ण करणार नाहीत त्यांना पदव्युत्तर शिक्षण घेता येणार नाही. शासकीय आणि खासगी वैद्यकीय या दोन्ही महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा होईल. देशात दरवर्षी तयार होत असलेल्या डॉक्टरांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येत आहे. प्रारंभी ही निर्णायक परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक स्वतंत्र अखिल भारतीय शाखा स्थापन करण्यात येईल. तूर्तास डॉक्टर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) राज्य शाखेत नोंदणी करीत असतात. आणि दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास हा परवाना स्थलांतरित केला जातो; परंतु यापुढे निर्णायक परीक्षा उत्तीर्ण करणारा डॉक्टर देशात कुठेही वैद्यक व्यवसाय करू शकेल.यासंदर्भात मंत्रालयाने तयार केलेल्या आराखड्यात विद्यमान विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेच्या (एफएमजीसी) आधारे ही निर्णायक परीक्षा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इ. स. २००२ मध्ये एमसीआयने एफएमजीसीला छाननी परीक्षेसाठी मान्यता दिली होती. विदेशातून पदवी घेऊन भारतात व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. आता सर्व एमबीबीएस डॉक्टरांसाठी ही परीक्षा घेण्याचा आरोग्य मंत्रालयाचा विचार आहे. विभागाच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला डॉक्टरांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने ही परीक्षा सुरू केली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना एमसीआयअंतर्गत राष्ट्रीय नोंदणी क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या आधारे ते देशात कुठेही प्रॅक्टिस करू शकतील. शिवाय या व्यवस्थेमुळे सरकारला परीक्षेच्या निकालानुसार महाविद्यालयांचा दर्जा ठरविणेही सोपे जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एमबीबीएस डॉक्टरांची होणार आता ‘एक्झिट एक्झाम’!
By admin | Updated: June 2, 2015 00:48 IST