ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - भारत - पाक सीमारेषेवर दररोज शस्त्रसंधींचे उल्लंघन होत असतानाच युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. टँक, एअर डिफेंन्स, अँटी टँक गाइडेड मिसाईल्स, स्पेशलाईज्ड मशीन गन मॅगझिन्स,ग्रेनेड्स अशा प्रमुख शस्त्रांचा भारताकडे तुटवडा असून यातील काही युद्धसामग्री आठवडाभरातच संपेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
भारताकडे उपलब्ध असलेला शस्त्रसाठा ब-याच वर्षांपासून वापरण्यात आलेला नाही तसेच देशभरातील ३९ ऑर्डीनन्स फॅक्टरीत संथगतीने होणा-या उत्पादनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. साधारणतः सैन्याकडे घनघोर युद्धात ३० दिवस पुरेल आणि सामान्य युद्धात ३० दिवस पुरे ऐवढा शस्त्रसाठा आणि दारुगोळा असणे अपेक्षीत असते. तीन दिवस चालणारे सामान्य युद्ध हे एक दिवस चालणा-या घनघोर युद्धाच्या बरोबरीत समजले जाते. यानुसार सैन्याकडे घनघोर युद्धात ४० दिवस पुरेल ऐवढा शस्त्रसाठा असणे अपेक्षीत असते.मात्र भारतीय सैन्याकडे २० दिवस पुरेल ऐवढाच दारुगोळा उपलब्ध आहे. मोदी सरकारला वस्तूस्थितीची पूर्णतः जाणीव असून यावर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले. भारताकडे आवश्यक शस्त्रसाठा आणि दारुगोळा असावा यासाठी सुमारे ९७ हजार कोटी रुपये लागणार असून २०१९ पर्यंत भारताची स्थिती सुधारेल असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. कारगिल युद्धादरम्यानही भारताकडे पुरेसा दारुगोळा नसल्याने इस्त्रायलकडून दारुगोळा घेण्याची नामूष्की सरकारवर ओढावली होती. मात्र यातून अद्याप बोध घेतलेला नाही असेच दिसत आहे.