ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - बॉक्सिंगमध्ये पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारी मेरी कोम सध्या मणिपूरमधील हिंसाचारामुळे व्यथीत झाली आहे. भीतीचे वातावरण कायम राहिल्यास मणिपूर सोडून दुस-या राज्यात स्थलांतर करण्याचा विचार सुरु असल्याचे मेरी कोमने म्हटले आहे.
मेरी कॉम सध्या बंगळुरुत पुढील वर्षी होणा-या जागतिक स्पर्धेची तयारी करत असून या दरम्यान मेरी कोमने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. मणिपूरमधील १८ जवानांची हत्या झाल्याचे वृत्त ऐकले तेव्हा मी सरावात होते. हे वृत्त ऐकून सुरुवातीला मला धक्काच बसला. मणिपूरमधील हिंसाचार पुन्हा एकदा वाढत असून तिथे नेहमीच भीतीचे वातावरण असते. आता मला तीन लहान मुलं असून भीतीचे वातावरण कायम राहिल्यास मणिपूर सोडण्याचा विचार सुरु आहे असे तिने सांगितले. तर बॉक्सिंगपटू सरितादेवीनेही मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना अस्वस्थ करणा-या आहेत असे सांगत या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे