ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.२३ - दहशतवादामुळे धुमसत असलेल्या काश्मीर खो-यातील नागरिकांनी बुलेटने बॅलेटला उत्तर देत विक्रमी मतदान केल्यानंतर राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असून भाजपा व पीडीपी यांच्यातील लढतीमुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पीडीपी २६ तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्ष मागे फेकला गेला आहे. एनसी १७ तर काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे. सध्या कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपा पीडीपीची साथ घेईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
८७ जागांसाठी झालेल्या या विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता नागरिकांनी निर्भयपणे मतदान केले. मोदींच्या करिश्म्यामुळे भाजपाने प्रथमच या राज्यात एवढी मुसंडी मारली आहे. नॅशनल कॉन्फरन्सची घसरण कायम असून काँग्रेस पक्ष चौथ्या स्थानावर आहे.