ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१९- इराकमधील मोसूल शहरात बेपत्ता असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला असून इराक सरकारने अपह्रत भारतीयांच्या ठावठिकाणाही शोधला आहे असे परराष्ट्र मंत्रालयच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र याविषयी अधिक जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
इराकमधील मोसूल येथे बांधकाम साईटवर काम करणारे ४० कामगार बेपत्ता झाले होते. या कामगारांचे अपहरण झाल्याचे वृत्त होते. गुरुवारी दुपारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताला दुजोरा दिला. भारत सरकार इराक सरकारच्या संपर्कात असून भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. इराक सरकारने अपह्रत भारतीयांना कोठे ठेवले आहे याचा शोध घेतला आहे असे त्यांनी सांगितले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव याविषयीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
अपह्रत भारतीयांमध्ये पंजाब आणि केरळ येथील नागरिकांचा समावेश असून इराकमध्ये त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अपह्रत भारतीयांना मायदेशी परतणे अशक्य आहे अशी भिती व्यक्त होत होती. याविषयी अकबरुद्दीन म्हणाले, कागदपत्रांची पूर्तता हा महत्त्वाचा विषय नाही. परदेशातील कोणत्याही भारतीयाने भारतीय दुतावासाशी संपर्क साधल्यास त्यांचे कागदपत्र फॅक्स किंवा अन्य माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची सोय करु.
दरम्यान, गुरुवारी सकाळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेकडे लक्ष असल्याचे सांगितले. मी व माझे सहकारी भारतीयांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न करत आहोत असे स्वराज यांनी सांगितले होते. स्वराज यांनी पंजाब व केरळमधील मुख्यमंत्र्यांशीही फोनवरुन चर्चा केली.