ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - मतदान केंद्राबाहेर मतदारांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागण्याचे दिवस आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. मतदाराचा वेळ वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाने आता नवनवीन योजना राबवण्याचा विचार सुरु केला असून याअंतर्गत मतदारांना मतदानासाठी वेळेची आगाऊ नोंदणी करणे शक्य होण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र नेहमीच दिसते. यामुळे मतदारांचा वेळही वाया जातो व रांगेत उभे राहावे लागेल या भीतीपोटी अनेक मतदार मतदानाकडे पाठ फिरवतात. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. मतदान केंद्रावर येण्यापूर्वी मतदारांना त्यांना कोणत्या वेळेत मतदान करणे शक्य आहे याची माहिती देता येईल. मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. या योजनेवर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती एका वरिष्ठ निवडणूक अधिका-याने इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.
मतदानासाठी वेळेची आगाऊ नोंदणी करण्यासोबत मतदान केंद्रावर टोकन सुविधाही सुरु केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मतदान केंद्रावर गेल्यावर मतदाराला टोकन दिले जाईल व टोकन क्रमांक आल्यावर त्याला मतदानाचा हक्क बजावता येईल. यामुळे रांगेचे व्यवस्थापन करणे शक्य होईल असे अधिका-यांचे म्हणणे आहे. स्थलांतरित कामगारांनाही मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी निवडणूक आयोगाने एका समितीची स्थापना केली आहे.