नवी दिल्ली : केंद्रात तीनदा अर्थमंत्रिपद, नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम, देशासमोरील आर्थिक आव्हाने पेलण्याच्या ध्यासाने दररोज १६ तास काम, अशी वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्द लाभलेले अर्थमंत्री पी. चिदंबरम गुरुवारी अर्थमंत्रालयातील आपले चेंबर सोडताना अतिशय भावुक झाले होते. सचिव आणि वरिष्ठ अधिकार्यांसमोर बोलताना त्यांनी देशासमोरील आर्थिक आव्हानांचा उल्लेख केला. सार्वजनिक जीवनात याआधीपेक्षा जास्त सक्रिय राहणार असल्याची ग्वाही दिली. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर सर्वाधिक दहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम असून तो अद्याप अबाधित आहे.मी १९६६ पासून दररोज १६ तास काम करीत असून यानंतरही हा दिनक्रम कायम राहील. यानंतर तुम्ही मला सार्वजनिक जीवनात यापेक्षा अधिक सक्रिय बघाल असेही ते म्हणाले. चिदंबरम यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याचे टाळल्यामुळे ते राजकारणातून निवृत्त होणार अशी चर्चा होती.निरोप समारंभाच्यावेळी चिदंबरम अतिशय भावुक झाले होते. असे भावुक होण्याचा त्यांचा स्वभावच नाही, असे नॉर्थ ब्लॉकमधील अर्थमंत्रालयात चिदंबरम यांच्यासोबत दीर्घ काळ काम करणार्या एका अधिकार्याने सांगितले. संपुआ २ मध्ये अर्थमंत्री म्हणून अखेरच्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता ते नॉर्थ ब्लॉकमध्ये हजर झाले. त्यांनी फायलींचा निपटारा केला आणि वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली.ड्रीम बजेटचे सूत्रधार.....एच.डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वातील संयुक्त आघाडी सरकारमध्ये १९९६ मध्ये ते पहिल्यांदा अर्थमंत्री बनले होते. १९९७- ९८ चे ड्रीम बजेटचे सूत्रधार चिदंबरम हेच होते. संपुआ-१ च्या अखेरच्या काळात गृहमंत्रिपद सांभाळणारे चिदंबरम ऑगस्ट १२ मध्ये अर्थमंत्रालयात परतले तेव्हा त्यांच्यासमोर अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान होते. वित्तीय आणि चालू खात्यातील तूट मर्यादेपेक्षा वाढू नये यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.
अर्थमंत्रालयाला निरोप देताना भावुक झाले चिदंबरम नऊ अर्थसंकल्पांचा विक्रम : आर्थिक आव्हानांचा केला सामना
By admin | Updated: May 15, 2014 23:57 IST