नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुतमाची हवा डोक्यात गेल्याने ‘हिंदुत्वाचा अॅजेंडा’ नेटाने पुढे दामटण्यासाठी चौखूर उधळलेल्या भगव्या ब्रिगेडची मजल आता निस्पृह सेवेसाठी संपूर्ण जगाने गौरविलेल्या मदर तेरेसा यांच्या बदनामीची पद्धतशीर मोहीम राबविण्यापर्यंत गेली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचा पाहुणचार घेतल्यानंतर कान टोचल्याने रोमन कॅथॉलिक चर्चने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही दिल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी धर्मांतरावरून नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांवर चिखलफेक करावी यामागे सुनियोजित योजना असावी हे स्पष्ट आहे. मदर तेरेसा यांनी निराधार आणि गरिबांची केलेली सेवा निस्पृह नव्हती तर त्यायोगे धर्मांतर करण्याचा त्यांचा हेतू होता, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन बागवत याने केलेल्या विधानाने या वादाची पहिली ठिणगी पडली. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याची माझे सरकार जराही गय करणार नाही, असे म्हणणारे मोदी मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे सरकारने डोळे वटारल्यासारखे करावे व तो इशारा नसून अप्रत्यक्ष फूस आहे असे मानून भगव्या मंडळींनी आपला अॅजेंडा अधिक जोमाने राबवावा, असे आतून ठरले असावे, असा वास यातून अनेकांना येत आहे.भागवत यांच्या वक्तव्याशी सरकारचा काही संबंध नाही, असे भाजपा खासदार मीनाक्षी लेखी सांगून मोकळ््या झाल्या. तवा तापलेला आहे हे पाहून केंद्र व राज्यातील सत्तेत धाकटे भावंड असलेल्या शिवसेनेनेही त्यावर पोळी भाजून घेतली. ‘सामना’ या सेनेच्या मुखपत्राने भागवत यांची पाठराखण केली.मदर तेरेसा हयात असतानाही या संस्थेत धर्मांतर घडवून आणले जात नव्हते व आताही जात नाहीस अशी प्रतिक्रिया मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज आॅफ चॅरिटी’च्या प्रमुख प्रवक्त्या सिस्टर सुनीता कुमार यांनी दिली.(लोकमत न्यूज नेटवर्क)
तेरेसांविरूद्ध भगव्या ब्रिगेडची मोहीम!
By admin | Updated: February 26, 2015 05:51 IST