नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी पाठविलेल्या पत्रात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून, पावसाळी अधिवेशनात त्यासंबंधी विधेयक आणण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन भाजपाशासित राज्यांमध्ये दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संपुआ सरकारने दलित अत्याचार प्रतिबंधक वटहुकूम आणला होता. रालोआ सरकारने हा वटहुकूम मोडित काढला असून त्याजागी आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणावे, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या मध्य प्रदेशातील महू गावाला भेट देणार असून, डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तेथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या पत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दलितांवरील अत्याचार; सोनियांचे मोदींना पत्र
By admin | Updated: June 2, 2015 00:52 IST