ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - म्यानमारमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई ही बदललेली मानसिकता दर्शवते असे सूचक उद्गार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले आहेत. तसेच पाकिस्तानवर निशाणा साधताना भारताच्या नव्या अवताराची ज्यांना भीती वाटतेय त्यांनी आत्ताच तशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली असल्याचेही पर्रीकर म्हणाले.
जर विचार करण्याची मानसिकता बदलली तर बरच काही चांगलं घडू शकतं असं सांगताना याचं प्रत्यंतर गेल्या देन-तीन दिवसांमध्ये आल्याचंही त्यांनी सांगितलं. या एका कारवाईमुळे देशाच्या संपूर्ण संरक्षणविषयक दृष्टीकोनात बदल झालेला दिसून आल्याचं पर्रीकर यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
देशाच्या संरक्षण सामग्रीच्या खरेदीमध्येही असाच मानसिक बदल घडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तान म्हणजे म्यानमार नसल्याचे सांगत पाकिस्तानचे मंत्री निसार अली खान यांनी भारताने पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची कारवाई करण्याचा विचारही करू नये अशी ताकिद दिली आहे. तर, म्यानमारमध्ये भारताने केलेली कारवाई हा अन्य शेजा-यांना इशारा असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही केले आहे.