नाशिक : महापालिकेने गोदापात्रात टाकलेली माती, बांधलेले पूल आणि होळकर पुलाजवळील बंधारे यामुळे २००८ मध्ये नदीस महापूर आला, असे सांगणाऱ्या पाटबंधारे खात्याने महापालिकेला प्रवाहाचे अवरोध हडविण्याचा सल्ला दिला. परंतु आता त्याच पाटबंधारे खात्याने गोदापात्रात घाट बांधण्याचा घाट घातला असून, त्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी यापुढे महापूर आलाच तर जिल्हाधिकारीच जबाबदार राहतील, असा लघुसंदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे खात्याच्या वतीने नदीत घाट बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु नदीपात्रात थेट बांधकाम सुरू होत असल्याने नदीपात्राचा संकोच होण्याची आणि परिणामी पावसाळ्यात महापूर येण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. यापूर्वी शहरात २००८ मध्ये गोदावरी नदीला महापूर आला होता. त्यानंतर त्याचे विश्लेषण करणाऱ्या पाटबंधारे खात्याने नदीपात्रात झालेल्या बांधकामांचा उल्लेख करीत त्यामुळेच हे पात्र संकोचले गेल्याचा निष्कर्ष काढला होता. पालिकेने होळकर पूल येथे बांधलेला बंधारा हटविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या; परंतु आता पाटबंधारे खातेच नदीपात्रात घाटाचे बांधकाम करीत असल्याने महापूर आल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांना भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठविला आणि घाटामुळे शहरात महापूर आल्यास जिल्हाधिकारीच जबाबदार राहतील, असे म्हटले आहे. कुंभमेळ्याचा पैसा अक्षरश: पाण्यात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी महापौरांची भेट घेतली आणि टाळकुटे पूल ते गोदा-कपिला संगमापर्यंत घाट बांधल्याने होणारे दुष्परिणाम सांगितले. सदरचे बांधकाम महापालिका करीत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर वाघ यांनी दिले.