नाशिक : शहरातील पाणीकपात रद्द केल्यानंतरही चार विभागांत एकवेळ निर्णय पालिका मागे घेणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात महापौर आणि आयुक्त यांच्यात गुरुवारी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.यंदा पावसाने ओढ दिल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेने ७ जुलैपासून पाणीकपात जाहीर केली. सिडको व सातपूर विभागात एकवेळ पाणीपुरवठा होत असल्याने पूर्व आणि नाशिक पश्चिम तसेच पंचवटी आणि नाशिकरोड विभागात दोनऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातच पाणीकपात करून सुमारे १५ टक्के बचत करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या ५ आॅगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली असली, तरी चारही विभागांत एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु त्यासंदर्भात आता तक्रारी वाढु लागल्या आहेत. नाशिकरोड विभागात तर जलकुंभांची पुरेशी क्षमता नसल्याने दोन टप्प्यांत पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने पुन्हा दोनवेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असून, भाजपाचे गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी त्यासंदर्भात महापौरांकडे विनंती केली आहे. त्यामुळे महापौर अॅड. वाघ हे गुरुवारी आयुक्तांशी चर्चा करणार असून, त्यानंतर शहराच्या चारही भागांत पुन्हा दोनवेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा दोन वेळेस पाणीपुरवठा?
By admin | Updated: August 15, 2014 00:38 IST