त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? असा संतप्त सवाल त्र्यंंबकवासीयांनी केला आहे.नगरपरिषदेच्या एका परिपत्रकात अंबोली धरणाचे पाणी कमी झाल्याने येत्या २१ एप्रिलपासून दिवसाआड फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा झोन पध्दतीने करण्यात येणार आहे. वास्तविक दर सिंहस्थ कुंभमेळ्यात पाणीपुरवठा योजनेच्या अंबोली व गौतमी गोदावरी (बेझे) धरणाचे त्र्यंबकेश्वरसाठी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर बेझे धरणावर त्र्यंबकेश्वरसाठी २७ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना करून आगामी २५ वर्षे एक लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा अंबोली व बेझे येथे पुरेल, अशी तरतूद नगरपरिषदेने केली आहे.दोन दोन धरणे अधिक पालिकेचे स्वतःचे अहिल्या धरण असताना दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. जे अंबोली लघुपाट धरण नाशिक इरिगेशनच्या ताब्यात आहे ते म्हणतात, जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल. या शिवाय गौतमी प्रकल्प हाताशी आहे. त्यातही भरपूर पाणी असताना त्र्यंबक साठी सध्या १० टक्के आरक्षण असताना शहरासाठी आरक्षण वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.