सटाणा : भुताटकी करत असल्याच्या संशयावरून गावातून बहिष्कृत केलेल्या कुटुंबाला जीव वाचविण्यासाठी तब्बल २१ दिवसांपासून रानोमाळ भटकंती करत लपत फिरण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील मानूर खैराडपाडा येथील पंडित बहिरम या आदिवासी कुटुंबावर हा हृदयद्रावक प्रसंग गुदरला आहे.बागलाण तालुक्यातील मानूर खैराडपाडा येथील जिवतूबाई व पंडित बहिरम हे आपल्या मंगळ्या, रमेश व तुळशी या मुलांबरोबर राहत. दीड बिघे जमीन कसून उदरनिर्वाह करत असताना या कुटुंबावर सोमानामक भोंदूबाबाने अंगात आल्यानंतर जिवतूबाई भुताळीण असल्याचे सांगितल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्यावर रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात पंडित यांच्या घराजवळच राहणारा त्यांचा धाकटा भाऊ पंढरीनाथ याची मुलगी संगीता (१०) ही तापाने फणफणली होती. तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान संगीताचे आई-वडील तिला घरी घेऊन आले. ताप उतरत नसल्यामुळे कळवण तालुक्यातील भोती (जयदर) येथील सोमा महाराज या जादूटोणा करणाऱ्या बाबाला मानूर खैराडपाडा येथे पाचारण करण्यात आले. १३ आॅगस्टच्या रात्री संगीतावर सोमाने अघोरी विद्येचा वापर सुरू केला. मात्र उपचाराभावी ताप थेट मेंदूत गेल्याने संगीताची प्राणज्योत मालवली. तरीही सोमाचे तंत्रमंत्र सुरूच होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक सोमाच्या अंगात आले. त्याने तुमच्या घरात जिवतूबाई ही भुताळीण आहे. तिने आतापर्यंत अकरा जणांना खाल्ले असून, आता संगीताचा बळीही तिने घेतला असल्याचे सांगितल्याने संगीताच्या मृतदेहाजवळच सख्ख्या भावासह गावकरी जिवतूबाई, पंडित दांपत्यावर तुटून पडले. बचावासाठी सदर दांपत्य तिन्ही मुलांसह घरात लपून बसले. मात्र गावकऱ्यांनी घरावर दगडफेक करून कुऱ्हाडीने दरवाजा तोडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुटुंबीयांनी घराच्या मागील दरवाजाने जंगलात पळ काढून आपला जीव वाचवला. (वार्ताहर)
जीव वाचविण्यासाठी भटकंती
By admin | Updated: September 5, 2015 00:23 IST