येवला : नागडे बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली असून, ग्रामस्थांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्ग उड्डाणपुलाचे काम कोटमगाव रेल्वे गेटजवळ सुरू आहे. या महामार्गाची सर्व वाहतूक नागडे या गावावरून वळविण्यात आली आहे. नागडे-कोटमगाव हा रस्ता अरुंद व एकेरी आहे. अवजड मालवाहतूक, बस व प्रवासी सर्व प्रकारची सुमारे १४०० ते १५०० वाहने रोज याच रस्त्याने ये-जा करतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने नागडे ते कोटमगावदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे खासगी वाहने आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच नाशिककडून औरंगाबादला जाणाऱ्या वाहनांसाठी नागडे गावात लक्ष्मीदेवी मंदिराजवळ दिशादर्शक फलक अस्पष्ट व चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे अनेक वाहने भारमपर्यंत निघून जातात. असे रस्ता चुकण्याचे प्रकार रोज घडत आहे. काही दिवसांपूर्वी लोखंडी भंगार घेऊन जाणारा ट्रक खराब रस्त्यामुळे पलटी झाला होता. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रस्त्याची सुधारणा संबंधित विभागाकडून तात्पुरती माती टाकून करण्यात आली होती; परंतु पावसामुळे त्याच खड्ड्यांमध्ये चिखल तयार होऊन अवजड वाहने रस्त्यातच फसून बसण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अनेक वेळा खोळंबादेखील होतो.भविष्यात या सर्व्हिस रस्त्यावर मोठा अपघात होऊ शकतो असे या रस्त्याच्या पाहणीवरून लक्षात येते. तरी या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
नागडे-बायपास रस्त्याची झाली चाळण
By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST