नाशिकरोड : ऋतुरंग भवनमध्ये मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आयोजित पहाट पाडवा कार्यक्रमात गायक प्रसाद खापर्डे यांनी उपस्थित रसिकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. दत्तमंदिर बसथांबा येथील ऋतुरंग भवनमध्ये ऋतुरंग परिवाराच्या वतीने आयोजित पहाट पाडवा कार्यक्रमाचे यंदा १७ वे वर्ष होते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास वसंत नगरकर, योगेश्वर दंडे, गायक प्रसाद खापर्डे व सहकलाकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. गायक प्रसाद खापर्डे यांनी राग भटीयार, बंदीश- बरनीना जाय, द्रुत तरपत बिती सगरी रैना, तराना, राग अल्हैया बिलावलमधील सुमिरन कर भज राम नाम को तसेच विठ्ठल किती गावा विठ्ठल चित्ती घ्यावा, कान्हा बनाए जमुवाली, हरी आला रे आदि भजने सादर करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता श्रीरामचंद्र कृपालू भजमन या भैरवीने झाली. यावेळी नितीन वारे (तबला), सुभाष दसककर (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), आस्था मांदळे (तानपुरा), ऋषिकेश शेलार (तानपुरा) यांनी साथ दिली. सूत्रसंचालन व कलाकारांचा परिचय तन्वी अमित यांनी करून दिला. आभार संतोष जोशी यांनी मानले. यावेळी नगरसेवक संभाजी मोरूस्कर, रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, ज्योती खोले, डॉ. सीमा ताजणे, ऋतुरंग परिवाराचे विजय संकलेचा, राजा पत्की, वसंत घोडके, नितीन क्षत्रिय, सुभाष पाटील, अरुण पाटील, प्रकाश पाटील, अमित देवडे, पुष्पा गवांदे आदि उपस्थित होते. प्रायोजक गोविंद जयकृष्ण दंडे अॅन्ड सन्स होते.
विठ्ठल गावा; विठ्ठल चित्ती घ्यावा
By admin | Updated: March 28, 2017 23:11 IST