विक्रम देवरे
दरेगावअरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, डाळींबबागांचे संकट व उशिरा झालेल्या खरिपाच्या पेरण्या यासारख्या चक्रव्यूहाने बळीराजा चिंताग्रस्त आहे. तालुक्यातील पूर्व भाग सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. सिंचनाची कोणतीही सोय नसल्यामुळे केवळ निसर्गावर अवलंबून असणारे येथील शेती व शेतीपूरक व्यवसाय दृष्टचक्रात सापडले आहे. जनावरांचा चारा संपुष्टात आला असून, चारा आणायचा कोठून हा प्रश्न आहे. दरेगाव परिसरात डाळींबबागा भरपूर आहेत. मात्र गतवर्षीही अत्यल्प पाणी यावर्षी मान्सूनचे लांबलेले आगमन यामुळे डाळिंबाचे भवितव्य धोक्यात आले असून, पाणीपुरवठ्यासाठी कोणतीही यंत्रणा नसणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी डाळींबबाग तोडून टाकल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी जळालेल्या बागा पाऊस येईल या आशेने छाटणी करून ठेवलेल्या आहेत. या भागात बोटावर मोजण्याइतके शेतकऱ्यांकडे असणाऱ्या शेततळ्यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. काहंी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात डाळींब बहार धरून ठेवलेला आहे. त्यासाठी गेल्या दोन-चार महिन्यांपासून दूरवरून टॅँकरद्वारे पाणी विकत आणणारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले असून, अनेकांना ऐन मध्यावर आलेले पीक धरावे की सोडावे, अशी परिस्थिती आहे. एकतर कांदा बियाण्याची टंचाई आहे. त्यातच थोडेफार बियाणे आहे त्याची रोपे तयार करण्याइतपतसुद्धा पाणी नाही. टमाटा या पिकाची हीच परिस्थिती आहे. पाऊस नसल्याने अद्यापही पेरणीपूर्व मशागती जमिनीच्या झालेल्या नाही. तसेच खरिपासाठी लागणाऱ्या बी-बियाणे खरेदीही थांबली आहे. (वार्ताहर)