नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर विभागातील ८८९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्सची मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना झेरॉक्स देण्याचे काम मंडळात सध्या युद्धपातळीवर सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे ४७५ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची झेरॉक्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्राप्त झाल्यानंतर पाच दिवसांत काही शंका असल्यास विद्यार्र्थी मंडळाकडे तक्रार करू शकतात. दरम्यान, आत्तापर्यंत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे समजते. गेल्या फेब्रुवारी/मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी विभागातील ७५१ महाविद्यालयांतून एक लाख ३३ हजार १४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी एक लाख ३२ हजार ९६१ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख १७ हजार ९४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाच्या निकालाची एकूण टक्केवारी ८८.७१ इतकी आहे. बारावीत जे विद्यार्थी थोडक्यात अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांना आपणाला कमी गुण मिळाले किंवा गुण देताना काही त्रुटी असण्याची शक्यता वाटते, असे विद्यार्थी उत्तरपत्रिका मिळविण्यासाठी अर्ज करतात. त्यानुसार विभागातील सुमारे ८८९ विद्यार्थ्यांनी मंडळाकडे अर्ज सादर करून उत्तरपत्रिका झेरॉक्सची मागणी नोंदविली होती. २१ जून ही मागणी नोंदविण्याची अखेरची तारीख होती. तत्पूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची झेरॉक्स दिली जात आहे. झेरॉक्सप्रत मिळाल्यानंतर विद्यार्थी आपल्या विषय शिक्षकामार्फत उत्तरपत्रिकेची तपासणी करून कशा पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्यात आली, याची खात्री करून घेऊ शकतात. जर विद्यार्थ्यांना काही शंका आल्यास किंवा गुणात फरक पडत असेल किंवा काही प्रश्नांना गुण देण्याचेच राहून गेले असेल तर असे प्रकार मंडळाच्या निदर्शनास आणून दिले जाऊ शकतात. मागीलवर्षी म्हणजेच मार्च २०१३ मध्ये नाशिक विभागातून एक लाख ४७ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ११७ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाकडे अर्ज सादर केले होते. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुन्हा मूल्यांकन केल्यानंतर ९८ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरफार झाल्याचे दिसून आले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांच्या एकूण टक्केवारीत वाढ झाली, तर काही अनुत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णही झाले आहेत. राज्यभरात अशा सुविधेचा लाभ घेतल्यामुळे ९३० विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. राज्याचा विचारा करावयाचा झाल्यास १५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ९३० विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाला. (प्रतिनिधी)