नाशिक : कश्यपी धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळेच वळण लागून नोकरी नाही तर जमिनी परत द्या, अशी मागणी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी रविवारी सायंकाळी धरणात साचणारे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांनी आठ तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्वांना अटक करण्यासाठी घेराव घातला. कश्यपी धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली असून, शासन दरबारी फक्त आश्वासने मिळत असल्यामुळे वैतागलेल्या प्रकल्पग्रस्तांनी नोकरी नसेल तर जमिनी परत द्या, अशा धोशा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी कश्यपी धरणात साचलेले पाणी सोडून देण्याचा प्रयत्न कश्यपीनगरातील काही तरुणांनी केला. पाटबंधारे खात्याचे काही अधिकारी व कर्मचारी धरणावर गेले असता, त्यांना धरणाचे दरवाजे बंद करण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांची दखल घेत, तातडीने पोलीस व नाशिक तहसीलदारांना त्याची माहिती देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ग्रामस्थांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. सोमवारी नाशिक तहसीलदारांनी कश्यपीनगरला जाऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. याच दरम्यान, हरसूल पोलिसांनी सोमनाथ मोंढे, दगडू धोंडगे, प्रकाश बेंडकुळे, अंबादास खोडे, लक्ष्मण बेंडकुळे, महेंद्र बेंडकुळे, सूरज मोंढे, तुकाराम मोंढे या आठ जणांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या देवरगाव, धोंडेगाव, गाळोशी, कश्यपीनगर येथील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आदिवासी नेते हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकल्पग्रस्त तरुणांना अटक केल्याने संपूर्ण ग्रामस्थांनाही अटक करावी, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांची समजूत घालण्यात आली. दुपारी आठही तरुणांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)
‘कश्यपी’चे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न
By admin | Updated: July 13, 2016 00:29 IST