मुकुंद बाविस्कर नाशिक‘मुखाने हरिनाम बोला, पायी हळूहळू चाला’, ज्ञानदेव तुकाराम निवृत्तिनाथ महाराज की जय’ अशा टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो मैलांचे अंतर पार करीत त्र्यंबकहून निघालेली संत निवृत्तिनाथ पालखी आणि त्यासोबतच्या दिंंड्या पंढरपूरनजीक दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तिनाथांची मुख्य पालखी आणि त्यासोबत सुमारे ७० हजार वारकरी असलेला ३५ दिंड्यांचा हा ताफा दरकोस दर मुक्काम करीत विठूमाउलीच्या दर्शनासाठी झाला खरा, परंतु त्यासाठी केवळ वारकऱ्यांंचेच नव्हे तर दानशूरांचेही पालखी प्रवास यशस्वी करण्यात मोठे योगदान आहे.आषाढी एकादशीला त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला पालखी नेण्याची परंपरा साधारणत: १२५ वर्षांपासून म्हणजे ६ जुलै १८८५ पासून अव्याहतपणे सुरू आहे. पूर्वी हा प्रवास ३० दिवसांचा होता, आता २१ दिवसांचा असतो. अवघ्या तीन आठवड्यांत पंढरपूर गाठावे लागते. पुढे यात अनेक दिंड्या सामील होतात. वारकऱ्यांचा एवढा मोठा ताफा नेणे सोपे नसते. त्यांच्या भोजनापासून मुलभूत सुविधांपर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा देणे आवश्यक असते. अर्थातच त्यासाठी विठूभक्त दानशूरांची भूमिका अत्यंत मोलाची असते. यासंबंधी माहिती देताना संत निवृत्तिनाथ पालखी ट्रस्टचे व्यवस्थापक पुंडलीकराव थेटे यांनी सांगितले की,वारकऱ्यांना सर्वप्रकारच्या सुविधा राज्यशासन जिल्हा परिषद, स्वंयसेवी संस्था व सेवाभावी सदभक्तांकडून प्राप्त झाल्याने ही पदयात्रा अत्यंत सफल झाली आहे. विशेष म्हणजे अनेक दानशूर भाविकांनी वारकऱ्यासाठी पाणी, शिधा, औषधी, उबदाार कपडे आदि सााहित्य पुरवून आपले नाव जाहीर केले नाही. त्यामुळे कोणत्या दिंडीसाठी कुठून मदत झाली हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु मदतीचे हजारो हात पुढे आल्यानेच २४ मुक्कामात सुमारे ३५५ कि.मी.च्या मार्गात कुठेही गैरसोय झाली नाही, असेही ते म्हणाले.
देणाऱ्याचे हात हजारो....
By admin | Updated: July 15, 2016 00:24 IST