नाशिक : कविता लिहिण्यासाठी यमक नव्हे तर शब्दात चमक असावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांनी केले. ‘प्रतिभासंगम’च्या दुसऱ्या दिवशी आनंद क्षेमकल्याणी व सतीश सोळांकुरकर यांनी शनिवारी निसर्गकवी नलेश पाटील व्यासपीठावर प्रा. अशोक बागवे यांची प्रकट मुलाखत घेतली. रावसाहेब थोरात सभागृहात बागवे यांच्याशी संवाद साधताना शालेय व महाविद्यालयीन जीवन, त्यांचा काव्यप्रवास व कविता, नाटक सादरीकरण आदि विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांनी मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. मुलाखतकार क्षेमकल्याणी आणि सोळांकुरकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना बागवे म्हणाले, दहावीला असताच पहिली कविता लिहिली. मुंबई टेलिफोनमध्ये नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण घेताना कवयित्री शांता शेळके शिक्षिका म्हणून लाभल्या. त्यांचा साहित्यमनावर प्रभाव झाला. तसचे त्यांनी ‘आलम’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रवास उलगडून सांगितला. नाट्य साहित्याविषयी बागवे म्हणाले, नाटक एक रचना असून संघर्ष नाटकाचा आत्मा आहे. कलाकार व प्रेक्षकांच्या संवादातून नाटक घडत असून, दिग्दर्शक नाटकाची दिशा ठरवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे’ स्वरचित कविता सादर केली. दरम्यान, कथाकथन व काव्यवाचन स्पर्धाही पार पडल्या. संध्याकाळी शहरातील अशोकस्तंभ, मॅरेथॉन चौक व गंगापूर नाका परिसरात पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी) कवितेला व्यासपीठ मिळणे आवश्यक कवितासंग्रह काढलाच गेला पाहिजे हे कवीसाठी महत्त्वाचे नसते, तर सभोवतालचे वर्णन करताना त्याने शब्दबद्ध केलेल्या भावभावना, कल्पना आणि विचारांना व्यासपीठ मिळणे आवश्यक असते, असे मत बागवे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी त्यांची प्रतिभा विकसित कशी होऊ शकते याविषयी विचार करणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी अर्जुनाप्रमाणे लक्ष केंद्रित करून निरीक्षण शक्ती वाढवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कवितेसाठी शब्दात चमक असावी लागते
By admin | Updated: September 25, 2016 01:49 IST