एस. आर. शिंदे ल्ललोकसभा निवडणुकीत देश ‘मोदीमय’ झाला असताना पेठ तालुक्यात मात्र मोदी लाटेचा परिणाम दिसून आला नाही. भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांना तालुक्यात पिछाडीवर रहावे लागले आहे़ पेठ तालुका तसा महायुतीचा बालेकिल्ला समजला जातो़ पेठ-दिंडोरीची आमदारकी शिवसेनेकडे आहे़ पेठ तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गटांवर सेनेचे वर्चस्व आहे़ पंचायत समितीत चार पैकी दोन सदस्य सेनेचे असल्याने सभापतिपदही शिवसेनेच्या ताब्यात आहे़ कोहोर जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाच्या मदतीने जागा खेचून आणली़ असे असतानाही चव्हाण यांना पेठ तालुक्यातून केवळ १३ हजार २०६ मते मिळू शकली़ ही विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी की विरोधी पक्षांचे ‘अर्थ’कारण यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत़ चव्हाण यांना मागील लोकसभा निवडणुकीतही पेठ तालुक्याने केवळ सात हजार मते बहाल केली होती़ त्यावेळी राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ उमेदवार होते़ झिरवाळांचे पेठ तालुक्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि नातेसंबंधाच्या जोरावर ही मते मिळू शकली असे म्हटले जात असे़ यावेळी मात्र डॉ़ भारती पवार या अगदीच नवख्या उमेदवार असताना त्यांना तालुक्यातून २५ हजार ४८ मतदारांनी स्वीकारले आहे़ चव्हाण यांची मतांची आकडेवारी सात हजारांवरून तेरा हजारांवर पोहचली ही केवळ शिवसेनेची कामगिरी असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात येत असून, निवडणुकीच्या काळात चव्हाण यांनी पेठ तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचेही बोलले जाते़ प्रारंभी चव्हाणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले मनसेच्या तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांनी महायुतीची साथ सोडल्याचे दिसून आले़ सर्वच निवडणुकांमध्ये या तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत असताना भाजपाची पक्षबांधणी मात्र तोकडी पडल्याची जाणीव या निवडणुकीत झाली़ राष्ट्रवादीने आदिवासी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते़ त्यामुळे प्रचारादरम्यान पेठ तालुक्यात क्वचितच दिसणार्या भारती पवार यांना पंचवीस हजार मते कशी मिळाली यावर आता सेना भाजपाच्या गोटात खल सुरू आहे़
पेठ बालेकिल्ल्यातच महायुतीची पिछेहाट झाल्याने आश्चर्य
By admin | Updated: May 24, 2014 12:09 IST