लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो शेतकरी बांधव त्यांचा विविध शेतमाल विक्रीसाठी आणतात. नेहमीच्या लिलाव प्रक्रियेनंतर ज्या व्यापार्याने माल खरेदी केलेला असतो त्याच्याकडे पारंपरिक जुने धडीकाट्यावर वजन केले जाते. अशा काट्यांवर वजनाची अचूकता दिसत नाही. त्यामुळे शेतकर्यांना तंतोतंत वजन मिळत नाही. पणन संचालक यांनी सर्व बाजार समित्यांना दि. १८ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या पत्रानुसार इलेक्ट्रॉनिक वजनकाटे सक्तीचे करण्याबाबत आदेश पारित केले होते. मात्र लासलगाव बाजार समितीने अद्याप याबाबत कार्यवाही केलेली नाही. तसेच मुख्य बाजार व विंचूर बाजार समितीत विक्री झालेल्या कांदा व शेतमालाचे वांधे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. काही व्यापारी शेतमाल विक्रीचे पैसे रोख न देता शेतकर्यांची अडवणूक करतात, असे या निवेदनात म्हटले आहे.
शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अन्यथा प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे येवला तालुकाप्रमुख अमोल फरताळे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन, तालुका संपर्कप्रमुख सचिन पवार, किरण चरमळ, चांदवड तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, शंकर गायके, जगदीश गायकवाड, गणेश लोहकरे आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.