पेठ : शासनाने जाहीर केलेल्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेची मुदत वाढवली असली तरीही पेठ तालुक्यात मात्र पीकविमा योजनेसाठी पेरणी की लावणी यावरून शेतकरी व जिल्हा बँक प्रशासनात चांगलीच जुंपली आहे. एकीकडे बँक प्रशासन विम्याची रक्कम भरून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असताना बँक प्रशासन मात्र शासनाच्या अध्यादेशाचा आधार घेत विमा पेरणीसाठी दिला जात असून, भात व नागलीच्या लावणीचा विमा घेतला जात नसल्यावर ठाम आहे़आदिवासी भागात साधारण मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भात व नागलीच्या बियाणाची पेरणी केली जाते़ पेरणी केलेल्या क्षेत्राचा दरवर्षी ३१ जुलैअखेर शेतकऱ्यांनी कोणत्याही सहकारी अथवा राष्ट्रीयकृत बँकेत विमा उतरवणे आवश्यक असते़ त्याप्रमाणे पेठ तालुक्यातील जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी ८ लक्ष ४८ हजार २१४ रुपये विम्याचा हप्ता नाशिक जिल्हा बँकेत भरणा केला़ त्यानंतर शासनाने याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढवली़ मात्र आदेशात वाढीव मुदतीचा लाभ केवळ १ ते १६ आॅगस्टदरम्यान पेरणी केलेल्या पिकांवरच लागू असल्याने बँक प्रशासनाने आॅगस्ट महिन्यात लावणी केलेल्या पिकांवरील विमा रक्कम स्वीकारण्यास नकार दिला़ तर शेतकऱ्यांनी मात्र उशिराने पेरणी झाल्याने आॅगस्ट महिन्यात लावणी केलेल्या पिकांनाही विमा संरक्षण द्यावे अशी मागणी केली़ यामुळे पीकविमा योजना ही पेरणी की लावणी यावर तालुक्यात चांगलाच खल सुरू आहे. यामुळे सामान्य शेतकरी मात्र चांगलाच बुचकळ्यात सापडला आहे़
पेरणी की लावणी यावरून शेतकरी व बॅँकेत जुंपली
By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST