मालेगाव कॅम्प : यंत्रमाग उद्योजकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यामुळेच केंद्र शासनाने पॉवरटेक्स योजना यंत्रमाग व्यवसायाचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी सुरू केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.केंद्र शासनाच्या पॉवरटेक्स इंडिया या योजनेच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड उपस्थित होते. भिवंडी येथे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचे व्हिडीओ कॉन्फरसन्द्वारे थेट प्रसारण येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात दाखविण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी योजनेची माहिती दिली. यापूर्वी मालेगाव, भिवंडी व इतर शहरातील यंत्रमाग उद्योजकांनी समस्या मांडल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पॉवरटेक्स इंडिया ही योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटनानंतर डॉ. भामरे पुढे म्हणाले की, मालेगाव व धुळे शहर यंत्रमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. देशभरातील ५० लाखांहून अधिक नागरिक या व्यवसायाला जोडले गेले आहेत. यंत्रमाग व्यवसायाला विजेची समस्या, अनुदान वाढविणे, यंत्रमागाचे आधुनिकीकरण, कर्ज, कामगारांच्या समस्या यावर लक्ष दिले जाणारआहे.पॉवरटेक्स इंडिया या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. यंत्रमाग व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक मदन गायकवाड, शहरातील यंत्रमाग उद्योजक, प्रांताधिकारी अजय मोरे, मनपा आयुक्त रवींद्र जगताप, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यंत्रमाग व्यवसायातील समस्या सोडवू
By admin | Updated: April 2, 2017 00:42 IST