नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी व्हायचेच नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी मनसेने ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेईकल) वगळून ठराव प्रशासनाला सुपूर्द करत आपल्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर दि. १५ डिसेंबरपर्यंत प्रशासन राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याने दोन दिवसांत शासन स्तरावर वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता भाजपातून व्यक्त केली जात आहे. महासभेने ‘स्मार्ट सिटी’चा चेंडू आता राज्य शासनाच्या कोर्टात ढकलला असून, शासनाने सदर ठराव विखंडित केल्यास महासभेच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा घेऊन सत्ताधारी मनसे आक्रमक होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. महासभेने ‘एसपीव्ही’ वगळून स्मार्ट सिटीचा ठराव प्रशासनाला सादर केल्याने भाजपाने सत्ताधारी मनसेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी मनसेने एसपीव्हीचा समावेश करत ठरावात बदल करावा यासाठी पुन्हा विशेष महासभा घ्यावी, याकरिता भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. स्थायीच्या चार सदस्यांची जमवाजमवही केली जात होती; परंतु सेनेने भाजपाला दाद न दिल्याने भाजपाचा विशेष सभा बोलाविण्याचा प्रयत्न फसला.
‘स्मार्ट सिटी’चा चेंडू शासनाच्या कोर्टात
By admin | Updated: December 12, 2015 23:33 IST