सातपूर : महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या साइडपट्ट्यांचे काम रेंगाळले असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने सातपूर परिसरात अनेक ठिकाणी साइडपट्ट्यांची कामे सुरू आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे या साइडपट्ट्यांच्या कामात पाणी साचत असल्याने चिखल होत आहे. शिवाय नागरिकांना येण्या-जाण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालय ते सातपूर राजवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहापर्यंत साइडपट्ट्यांचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम रेंगाळल्याने नुकत्याच झालेल्या पावसामुळे तेथील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे ही रेंगाळलेली कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे पावसाचे पाणी जेथे नेहमी साचते अशा ठिकाणी पाणी निचरा होण्याची सोय करण्याची मागणी होत आहे. सातपूर-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिंद्र अॅण्ड महिंद्र सर्कल, आयटीआय चौक, निमा कार्यालयासमोर, महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर आदि भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो; शिवाय अपघातही वाढत असतात. या सर्व ठिकाणी पाणी वाहून जाण्याची सोय करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)