सायखेडा : सुवर्णपदक विजेत्या निफाड सहकारी साखर कारखान्याला लागलेली घरघर थांबवून पस्तीस हजार सभासद आणि हजारो कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारदरबारी मध्यस्थी करून मार्ग काढण्याचे आश्वासन शरद पवारांनी निसाका बचाव समितीला दिले. पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले असताना बचाव समितीने पवारांना निवेदन दिले, तेव्हा पवार बोलत होते. एकेकाळी महाराष्ट्रात नंबर एक असणारा निफाड सहकारी साखर कारखाना चुकीच्या धोरणामुळे आणि तत्कालीन संचालकांमुळे डबघाईस गेला. कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज वाढले. शेतकऱ्यांना उसाला योग्य प्रमाणात भाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या कारखान्यांना ऊस पुरवठा केला आणि गाळप कमी होत गेले. गोदाकाठच्या तरुणांनी एकत्र येऊन निसाका बचाव समितीच्या माध्यमातून संघर्ष सुरू ठेवला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत आमदार अनिल कदम यांच्यामार्फत बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आता माजी आमदार दिलीप बनकर यांच्या मध्यस्थीने शरद पवार यांनी पुढाकार घेऊन मार्ग काढावा यासाठी बचाव समिती प्रयत्नशील आहे. यासाठी या मेळाव्यात शरद पवार यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. यावेळी सभासद आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. (वार्ताहर)ॅ
निसाका वाचविण्यासाठी साकडे
By admin | Updated: January 5, 2017 23:34 IST