नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन नाराजांना स्थायी समितीचे सदस्यपद बहाल करून खूश करण्याचा केलेला प्रयत्न मनसे व राष्ट्रवादीच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण मनसेकडून सदस्यपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या नगरसेवकांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. हीच स्थिती राष्ट्रवादीची असल्याचेही समजते. स्थायीच्या रिक्त झालेल्या सात जागांसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत ऐनवेळी प्रबळ दावेदारांचा पत्ता कट केल्याने मनसे व राष्ट्रवादीत नाराजांचा गट तयार झाला आहे. विशेष म्हणजे, पक्षांतर्गत गोंधळाची नामुष्की टाळण्यासाठी ऐनवेळी महासभेत आपापल्या उमेदवारांची नावे सादर करण्याची दक्षता दोन्ही पक्षांनी घेतली असतानाही वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे, तर नाराजीचे हे संपूर्ण नाट्य पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थायी सदस्यपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असला, तरी अधिकाधिक सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा ‘लाभ’ मिळण्यासाठी एक वर्ष पूर्ण झालेल्या सात सदस्यांचे मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने राजीनामे घेतले होते. त्यानुसार मनसेचे चार, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य निवडण्यासाठी विशेष महासभा बोलावण्यात आली. सदस्यपदासाठी दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची भीती दोन्ही पक्षांकडून वर्तविली जात होती. मनसेकडून गटनेते अशोक सातभाई यांच्यासह नगरसेवक सतीश सोनवणे, रुची कुंभारकर, रत्नमाला राणे यांची नावे अखेरपर्यंत निश्चित समजली जात होती; तर राष्ट्रवादीकडून शिवाजी चुंबळे, छाया ठाकरे, उषा अहिरे यांची नावे आघाडीवर होती; मात्र ऐनवेळी पत्ता कट केल्याने यातील काही मंडळींकडून उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. मनसेतील काहींनी तर थेट राज ठाकरे यांनी घेतलेल्या गुप्त बैठकांनाच दांडी मारून नाराजी व्यक्त केल्याने मनसेत सर्वकाही आलबेल नसल्याचेच चित्र बघावयास मिळत आहे. नगरसेवक सतीश सोनवणे यांनी तर थेट संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्यावर निशाना साधत, विशिष्ट लोकांनाच पदांची खैरात वाटली जात असल्याचा आरोप केला. आतापर्यंत मनसेच्या २५ नगरसेवकांना विविध पदे दिली गेली; मात्र ही पदे मर्जीतील नगरसेवकांनाच दिल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीमध्येदेखील अशाच प्रकारची धुसफूस ऐकावयास येत आहे. काही नगरसेवकांनी याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे याबाबतची तक्रार केल्याचेही समजते. दरम्यान आगामी विधानसभेच्या अगोदरच दोन्ही पक्षांमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (प्रतिनिधी)