संजीव धामणे ल्ल नांदगाव‘पेरते व्हा’ असे ओरडणारा शेतकऱ्यांचा मानसपक्षी यंदा नांदगाव तालुक्यात जणू ओरडलाच नाही. शेती पिकांचे खरीप उत्पन्न तब्बल २२० कोटी रुपयांनी घटले हे त्याचे द्योतक आहे. या अवस्थेमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकरी उद््ध्वस्ततेच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. तर परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने रब्बी हंगामाबद्दलच्या उरल्या सुरल्या आशादेखील मावळल्या आहेत. सर्वत्र अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असताना नांदगाव तालुक्यात नुकसान होण्यासाठी शेतात पिकेच उभी नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे किंंवा नुकताच झालेला किरकोळ स्वरूपाचा पाऊस रब्बीसाठी शेतकऱ्यांना उभारी देईल, अशी स्थितीदेखील नाही. मागच्या वर्षाशी यंदाच्या खरीप हंगामाची तुलना केली, तर वजनाच्या तुलनेत ते फक्त २१.६ टक्केच आहे. तर किमतीच्या तुलनेत ते केवळ ३१.५३ टक्केच आहे. पाण्याच्या आटणाऱ्या स्त्रोतांबरोबर आर्थिक स्त्रोतसुद्धा क्षीण झाले असल्याचा परिणाम नांदगाव तालुक्यातील बाजारपेठांवर दिसून येत आहे. सन २०१३/१४ या वर्षात खरीप हंगामात ३२१.५० कोटी रु. चे शेतीमधून उत्पन्न निघाले होते. तर यंदा २०१४ च्या खरीप हंगामात १०१.३९ कोटींचे उत्पन्न मिळाले. म्हणजे उत्पन्नातली तूट २२०.११ कोटी रुपयांची आली. या पार्श्वभूमीवर शेतीमालाचे उत्पादन टनात मोजायचे झाल्यास गेल्यावर्षी २०,५८१.२३ मे. टन खरीप पिकांचे वजन होते. तर यंदा ते केवळ ४४४८.९९ मे. टन भरले. याचा अर्थ नांदगाव तालुक्यातल्या शेतजमिनीने यावेळी १६१३२.२४ टन कमी उत्पन्न दिले. पर्जन्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर यंदा सरासरीच्या ६४.१९ टक्के पाऊस झाला. म्हणजे ४६७ मिमी सरासरीच्या तुलनेत फक्त २९७ मिमी पाऊस झाला. सरासरी प्रत्येक दहा वर्षांनी काढली जाते. आधीची सरासरी ५२७ मिमी होती. म्हणजे गेल्या दहा वर्षांत सरासरीदेखील ६० मिमीने घटली. घटणारी सरासरी ही धोक्याची घंटा आहे.२९७ मिमी पाऊस पडून ही खरीप हंगामाची तूट २२० कोटी रुपयांची आहे. याचे उत्तर सिंंचनात दडलेले आहे. येथील ९३.९८ टक्केशेती कोरडवाहू आहे. तर फक्त 0.0६ टक्केक्षेत्र बागायती आहे. त्यामुळे मुख्य उत्पन्न कोरडवाहू शेतीचे आहे. असे म्हणणे वावगे ठरू नये. यंदा पिकांच्या वाढीची अवस्था, फुले लागणे व दाणे भरणे या मुख्य पीक अवस्थेवेळी पावसाने दिलेल्या ताणामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. खरीप हंगामात पडलेल्या पर्जन्यावर रब्बी हंगामाचे जीवन अंकुरते. बागायती फुलते. जमिनीत जिरलेल्या पाण्यावर रब्बी हंगाम उभा राहतो. आॅक्टोबर महिन्याचा शेवट ते नोव्हेंबरचा उत्तरार्ध यात रब्बी हंगाम आकार घेतो. यंदा रब्बी हंगामात दि. १५ नोव्हेंबरपर्यंत फक्त १९ टक्के पेरणी झाली आहे. या हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा यांचा अपवाद वगळता करडई, सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी मका यांची पेरणीच झालेली नाही. पेरणी झालेल्या पिकांचे क्षेत्र फक्त १९ टक्केच आहे. म्हणजे खरिपापेक्षाही रब्बीची अवस्था गंभीर आहे. परतीच्या पावसाने नोव्हेंबर २००९ मध्ये येथे महापूर आणला होता. याची आठवण गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसाने नांदगावकरांना आणून दिली. २००९पासून ‘कोपलेला’ पाऊस नांदगाव तालुक्यात कालपरवा अवघा ७ मिमी ‘झिरपला’. रब्बी हंगामाची त्याने ‘काशी’ केली. जिल्ह्यात इतरत्र द्राक्ष बागाईतदारांना तो नकोसा होता. तिथे तो धो धो बरसला. नांदगावला तो पाहिजे होता तिथे त्याने फक्त ‘हजेरी’च लावली. तालुक्यातला शेतकरी पुन: कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नापासून पारखा केला. त्यामुळे बदलणाऱ्या निसर्गाची पावले ओळखून जलसिंंचनाच्या योजना खेचून आणल्या व शेतकऱ्यांनी जलव्यवस्थापनाकडे पावले वळवली तरच नांदगाव तालुका जगणार आहे. रब्बी पिकांच्या मार्गदर्शनासाठी तालुका कृषी विभागाकडे अद्याप योजना नाही. या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या भावविश्वात अजून ही वेड्या आशेचा किरण आहे. एखाद्या जोरदार बेमोसमी पावसाची त्याला प्रतीक्षा आहे...केवळ आणि केवळ रब्बी हंगामातून तरून जाण्यासाठी...यंदाचे वर्ष पास होण्यासाठी...
खरिपात ‘पेरते व्हा’चा आरव झाला नाही.. रब्बीतही तो बरसलाच नाही
By admin | Updated: November 21, 2014 23:30 IST