बैठकीत आपले प्रश्न, समस्या मांडत चर्चा करण्याऐवजी बैठकच घेऊ नका, असा प्रकार तालुक्यात प्रथमच घडला आहे. हा प्रकार योग्य नसल्याचे यावेळी अनेक सभासद, ऊस उत्पादकांनी सांगितले. कादवा कारखाना गेटवर एकत्र येत अनेक सभासद ऊस उत्पादकांनी गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास निषेध केला. चेअरमन श्रीराम शेटे यांनी यावेळी सभासदांची भेट घेत कोणत्याही प्रकारे निषेध न करता शांतता ठेवण्याचे आवाहन केले. ज्यांनी विस्तारीकरणाला विरोध केला, जे इथेनॉल प्रकल्पाला विरोध करीत आहेत, त्यांना कारखान्याची प्रगती बघवत नाही. अवनखेडमध्ये जो प्रकार काही जणांनी राजकीय विरोधासाठी केला, त्याला जास्त महत्त्व देऊ नका. अवनखेडमध्ये बैठक होऊ दिली नाही, हा अपप्रचार असून त्याठिकाणी बैठक झाली व काही ऊस उत्पादक सभासदांनी ठेवीही जमा केल्याचे शेटे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी संचालक बाळासाहेब जाधव, विश्वनाथ देशमुख, साहेबराव पाटील, वलखेडचे दिलीपराव शिंदे, अवनखेडचे प्रकाश पिंगळ, पालखेड बंधाऱ्याचे काका जाधव, हातनोरे येथील सुरेश बोरस्ते, दिंडोरीचे नरेश देशमुख, निळवंडीचे सोमनाथ पाटील, मातेरेवाडीचे दिनकर गटकळ, चिंचखेड येथील रावसाहेब पाटील, उमराळे खुर्दचे शाम हिरे, जोपुळचे डॉ. योगेश गोसावी, दहेगावचे अजित कड आदी सभासद ऊस उत्पादक यांनी मनोगत व्यक्त केले. आभार जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी मानले.