नाशिक : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दि. ६ रोजी तपोवनातील सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमात संत महासंमेलन आयोजित करण्यात आले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती विहिंपचे केंद्रीयमंत्री व्यंकटेश आबदेव यांनी दिली.संत महासंमेलनाच्या संबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना आबदेव म्हणाले की, संत महासंमेलनापूर्वी दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत त्र्यंबकेश्वर जुना आखाडा येथे नीलपर्वतावर विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची बैठक जुना आखाड्याचे पीठाधिश्वर अवधेशानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानंतर गंगाआरती व त्र्यंबकेश्वर दर्शन घेण्यात येऊन सर्व पदाधिकारी नाशिक येथे येतील. दि. ६ रोजी जनार्दन स्वामी आश्रमात दुपारी २ ते ६ या वेळेत होणाऱ्या संत संमेलनाला विहिंपचे अध्यक्ष राघव रेडी, कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया, महामंत्री चंपतराय, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, जगद्गुरू रामाधाराचार्य महाराज (हरिद्वार), जगद्गुरू हंसदेवाचार्य महाराज, महंत फुलडोसदास बिहारी, महंत धरमदास महाराज, सुरेशदास महाराज, राजेंद्र देवाचार्य, अग्रदेवाचार्य महाराज आदि संत महंत उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी जगद्गुरू रामभद्राचार्य महाराज तुलसीपीठ (चित्रकुट) हे उपस्थित राहणार आहेत, असेही आबदेव यांनी सांगितले. यावेळी बाबुजी जाटेकर, विजय करमरकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विश्व हिंदू परिषदेच्या संत महासंमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Updated: September 5, 2015 00:12 IST