नाशिक : सायबर हॅकर्स आपल्या आजूबाजूलाच असतात. आपल्याकडून इंटरनेट हाताळताना होणाऱ्या चुकांवर ते बारीक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे सोशल साइट अथवा कोणाला ई-मेल पाठविताना नेहमी ‘थांबा, विचार करा आणि पोस्ट करा’ या सूत्राचा वापर करायला हवा, असे प्रतिपादन गुरगाव व यूपी पोलिसांच्या सायबर क्राइम सेलचे सल्लागार तथा इंटरनेट अॅण्ड मोबाइल असोसिएशनचे कन्सल्टंट, ज्येष्ठ सायबरतज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.महाकवी कालिदास कलामंदिर येथे जितो (जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन) संघटनेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी टंडन यांनी स्मार्टफोन, सोशल मीडिया, इंटरनेट बॅँकिंगचा वापर करताना कोणत्या बाबींची सावधगिरी बाळगायला हवी, याबाबतची माहिती दिली. दरदिवसाला सोशल मीडियावरील क्राइमच्या घटना ऐकावयास मिळतात. या घटना लहान मुलांकडून सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याने सर्व पालकांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. २०१३ मध्ये दाखल झालेल्या पाच हजार ६९३ सायबर गुन्ह्यांमध्ये तीन हजार ३०१ गुन्हे १८ ते ३० वयोगटातील तरुणांकडून घडले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना खबरदारी घ्यायला हवी. विशेषत: तरुणींनी याबाबत अधिक दक्ष असायला हवे. इंटरनेट बॅँकिंग, स्मार्टफोनचा वापर करताना सर्व सुरक्षेच्या मुद्यांचा अभ्यास करायला हवा, अन्यथा हॅकर्सच्या जाळ्यात अडकावे लागेल. स्मार्टफोनच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर मिळत असली तरी, हॅकर्सचा त्यावर डोळा आहे, हे विसरू नये. सध्या देशात ३० कोटी जनता इंटरनेटचा वापर करते. मात्र, यातील काहींच्या प्रायव्हसीबाबत माहिती ठेवतात. आपला मोबाइल, लॅपटॉप यावर दिलेल्या प्रायव्हसीचा कटाक्षाने वापर करायला हवा. कारण हॅकर्स कुठलीही वेबसाइट अथवा माहिती हॅक करण्यात तरबेज झाल्याने प्रचंड धोका वाढला आहे. वाय फायचा वापर करताना मोडीयमचा पासवर्ड बदला. डब्ल्यूईपी न ठेवता डब्ल्यूपीके-२ या मोडवर ठेवा. फ्रिक्वेन्सी कमी ठेवा.आता तर सरकारी वेबसाइट हॅक करण्याइतपत त्यांची मजल गेली असून, मध्यतरी सीबीआयची अधिकृत वेबसाइट हॅकर्सनी हॅक केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशात घडलेल्या काही धक्कादायक घटनांची रक्षित टंडन यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी उपस्थित युवकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान त्यांनी केले. (प्रतिनिधी)
सोशल मीडिया, इंटरनेट बॅँकिंगचा वापर करताना सावधगिरी
By admin | Updated: April 19, 2015 00:45 IST