संगमेश्वर : आगामी पावसाळा लक्षात घेता शहर परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरांची व इतर वास्तूंची काळजी घेऊन डागडुजी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.कडक उन्हामुळे व उष्म्याने मालेगावकर नागरिक हैराण झाले असून, जोरदार पाऊस पडून यातून सुटका कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीतही येता पावसाळा लक्षात घेता नागरिकांनी आपल्या घरांची दुरुस्ती व डागडुजी करण्यास प्रारंभ केला आहे. अनेकांनी घरांचे पत्रे नवीन टाकून छप्पर दुरुस्त करून घेतले आहे. ज्यांची धाब्याची घरे आहेत त्यांनी खारी माती टाकून पावसापासून संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी कौले शाकारून घेतली आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनी मालेगाव शहराकडे धाव घेत प्लॅस्टिकचे कागद, बॅनर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या किदवाई रोड परिसरात याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली आहेत. नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी येथे दिसून येत आहे. घरांची छते दुरुस्त करणाऱ्या कारागिरांचे मंजुरीचे दर यामुळे वाढले आहेत. नागरिकांना याबाबतीतही वाढत्या महागाईची झळ सोसावी लागत आहे. (वार्ताहर)
पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीस प्रारंभ
By admin | Updated: June 13, 2014 00:19 IST