नाशिक : दहावी परीक्षेत घसघशीत गुण मिळविल्यानंतरही पालक संभ्रमात आहेत. मिळालेल्या गुणांमुळे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, या विवंचनेत पालक असल्याचे दिसून येते. ज्या विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांचे पालक संभ्रमात असणे स्वाभाविकच; परंतु ज्या मुलांना ९० टक्के गुण मिळाले आहेत अशा मुलांचे पालकही संभ्रमात असल्याचे समुपदेशकांना आलेल्या फोन कॉल्सवरून दिसून येते. दहावीत मिळालेल्या कमी गुणामुळे किंवा अनुत्तीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ नये म्हणून परीक्षा मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे.तथापि, या समुपदेशकांशी निराश झालेल्या विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी संपर्क साधलेला नाही, तर चक्क ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे विज्ञान, वाणिज्य किंवा डिप्लोमा शाखेला प्रवेश घ्यावा की तांत्रिक अभ्यासक्रम निवडावा, याविषयी पालक संभ्रमात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)