सिन्नर: गेल्या सुमारे वर्षापासून वीज देयक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास वीज वितरण कंपनीने प्रारंभ केला आहे. अनेकदा सांगूनही वीज बिल न भरणारे वीज ग्राहक महावितरणच्या रडारवर आहेत. देयक न भरणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात औद्योगिक, वाणिज्य प्रकारातील सुमारे ५० ग्राहकांची वीज तोडत आली आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहे.
वीज तोडण्यापूर्वी महावितरणने ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर नोटीस पाठवली आहे. तथापि, ग्राहक लेखी नोटीस न मिळाल्याची तक्रार करत आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने व वीज ग्राहक नियामक आयोगाने डिजिटल नोटिसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे मोबाईलवर पाठवलेली नोटीस अधिकृत मानण्यात येत असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर नोटीस पाठवण्यात येत आहे. वीज बिलाचा त्वरित भरणा करावा व कटू कारवाई टाळावी. वीज देयक भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. व्यवसायांना फटका बसला. त्यामुळे महावितरणने वीज तोडण्यापूर्वी ग्राहकांना कल्पना देऊन सहकार्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.
---------
काही ग्राहकांनी वर्ष उलटूनही वीज वितरण कंपनीच्या बिलाचा कोणताही भरणा केला नव्हता. १ एप्रिल २०२० नंतर औद्योगिक मधील ५८, वाणिज्य प्रकारातील ४८१ व घरगुती चार हजार ४६७ ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवली. तीनही विभागातील पाच हजार ग्राहकांकडे एकूण तीन कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी औद्योगिक व वाणिज्य प्रकारातील ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे वर्षभरापासून देयक न भरणाऱ्या २२५ ग्राहकांनी एकाच दिवशी देयकाचा भरणा केला.