नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. ०७) नवीन २६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, एकूण ६८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अडीच पटीहून अधिक असली तरी, जिल्ह्यात ४१ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४,९७४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येत पूर्वीच्या तुलनेत बळींचा आकडा अद्यापही चिंताजनक आहे. बळी जाणाऱ्यांपैकी बहुतांश रुग्ण हे प्रदीर्घकाळ कोरोनाशी झुंजत आहेत. मात्र, कुणाची वीस दिवसांनी, तर कुणाची महिनाभरानंतर ही झुंज अपयशी ठरत असल्यानेच जिल्ह्यातील मृत्यूच्या आकड्यात अद्याप घट आलेली नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १३०, तर नाशिक ग्रामीणला १२३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ०१, तर जिल्हाबाह्य ०९ रुग्ण बाधित आहेत. तसेच जिल्याह्त नाशिक मनपा क्षेत्रात १२, तर ग्रामीणला २२ असा एकूण ३४ जणांचा बळी गेला आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी, प्रदीर्घ काळापासून उपचार घेऊनही बरे न झालेले रुग्ण दगावत असल्यानेच बळींची संख्या तीस ते चाळीसच्या दरम्यान राहत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
सोमवारी अत्यल्प कोरोनाबाधित आढळल्याने एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या सहा हजाराखाली अर्थात ५७१२ पर्यंत घसरली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी प्रथमच उपचारार्थी रुग्णसंख्या सहा हजारांखाली आल्याने आरोग्य यंत्रणेनेदेखील काहीसा नि:श्वास सोडला आहे.