नाशिक : शहरात काही भागात वाहतुकीच्या सोयीसाठी वन वे घोषित केले खरे; परंतु तेथे फलक लावूनदेखील वाहनचालकांकडून कोणतेही पालन होत नाही. इतकेच नव्हे तर वन वे नसले तरी अनेक भागातून राँग साइडने जाण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक मार्गांवर रोजच वाहतूक कोंडी होत आहे.
शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. शहरातील वकीलवाडी, केटीएचएम कॉलेजसह अनेक भागात वाहतूक कोंडी होत आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाकादरम्यान स्मार्ट रोडचे काम सुरू असताना टिळकपथ सिग्नल ते रविवार कारंजा हा एकेरी मार्ग तात्पुरत्या स्वरूपात दुहेरी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता रस्ता सुरू होऊन वर्ष झाले तरी त्याचा दुहेरी मार्ग म्हणून सर्रास वापर सुरू आहे. धुमाळ चौक ते चांदीचा गणपती हादेखील दुहेरी मार्ग म्हणून वापरला जात आहे. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई पोलीस करीत नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात होत असतात. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
इन्फो...
केटीएचएम कॉलेजजवळ दररोजच गोंधळ
गंगापूररोडवर केटीएचएम कॉलेज परिसरात मोठे शैक्षणिक संकुल आहे. येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने केवळ प्रवेशव्दाराच्या समेारच छोटा उड्डाणपूल बांधला आहे. परंतु पंडित कॉलनीकडून जाणारे बहुतांश नागरिक या पुलाच्या खालून जाण्यासाठी राँग साइडने जातात. त्यातच याठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अत्यंत अरुंद असून, तासन् तास वाहतूक कोंडी होते.
इन्फो...
वकीलवाडीत वाहतूक पोलीस गायब
वकीलवाडी येथे एम.जी. रोडकडून अशोक स्तंभाकडे जाण्यासाठी वन वे आहे; परंतु अशोक स्तंभाकडून किंवा रविवार कारंजाकडून शॉर्टकट घेऊन राँग साइडने येऊन एमजीरोडकडे वाहनचालक येतात. याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक आहे. परंतु प्रत्यक्षात कधीच कर्मचारी जागेवर नसतो.
इन्फो...
रविवारपेठेतील नियमभंग नित्याचाच
अशोकस्तंभ ते रविवार कारंजादरम्यान बाजारपेठा आणि घाऊक धान्य मार्केट आहेत. परंतु, त्यामुळे येथे वर्षानुवर्षे एकेरी मार्ग असतानाही रविवार कारंजा किंवा रविवार पेठेतून अनेकजण वन वे तोडून जातात. सायंकाळच्या वेळी अशाेकस्तंभ परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या घारपुरे घाटाकडे जाणारा रस्ता बंद आहे. अन्यथा या चौकात सायंकाळी जाणे कठीण होते.
इन्फो..
वन वे तोडणाऱ्यांकडून वर्षभरात चार लाख १४ हजार रुपयांचा दंड वसूल
वाहनचालकाने वन वे तोडला तर त्यावर वाहतूक पोलीस कारवाई करतात, अशी माहिती पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली. शहरातील विविध ठिकाणी वन वे तोडल्याने वाहतूक पोलिसांनी आत्तापर्यंत वन वे (नो एन्ट्री तोडल्याबद्दल गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर १० हजार ६११ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी दोन हजार ७३ वाहनचालकांकडून चार लाख १४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे, तर आठ हजार ५३८ लोकांकडून अद्याप दंड वसुली करणे बाकी आहे. अशाच प्रकारे वन वे तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र आता वाढत्या गरजेनुसार वन वेची फेररचना करण्यात आली आहे.