निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांसाठी व गायी, गुरे-वासरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलावांत भोजापूरचे पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली. या मागणीचा ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करण्यात आला असून, तो पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे.परिसरात यंदा तिसऱ्यावर्षीही दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतपिकांना रिमझिम पावसाने जीवदान मिळाले आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना व गुरे-वासरे यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. या भागातील सर्वच जलस्रोत कोरडे ठणठणीत असल्याने या बंधाऱ्यांत भोजापूर धरणाचे पाणी पूरचाऱ्यांद्वारे सोडून ते बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच सुनीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भोजापूरचे पाणी बंधाऱ्यात सोडण्याच्या मागणीचा ठराव मांडण्याची सूचना उपसरपंच शशिकांत केकाणे यांनी मांडला. त्यास संगीता काकड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला व तो पाटबंधारे विभागाला पाठविण्यात आला आहे.पश्चिम पट्ट्यात पाऊस झाल्याने भोजापूर धरण गेल्या आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. मात्र तालुक्याच्या पूर्वभागात पावसाळ्याचे तीन महिने संपून गेले तरी पाऊस झाला नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. गावासह वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेला टँकर गेल्या चार दिवसांपूर्वी बंद करण्यात आल्याने रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागते आहे. परिसरातील बंधाऱ्यांमध्ये भोजापूर धरणाच्या चारीद्वारे पाणी सोडल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळेल व माणसं व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने सरपंच सौ. जाधव यांनी केली आहे. (वार्ताहर)
निऱ्हाळेकरांना भोजापूरच्या पाण्याची आस
By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST