नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिकमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवार (दि.२२) पासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे नाशिकमध्ये केव्हाही संचारबंदी लागू होऊ शकते, अशी चर्चा असताना रविवारी पालकमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या १,७३१ पर्यंत पोहोचली. मागील पाच दिवसांत तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले. गेल्या पाच दिवसांत नाशिक शहरात ४१०, ग्रामीण भागात ७७, तर मालेगावमध्ये १४० रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता नागरिकांमधील बेफिकीरी वाढल्याचा निष्कर्ष समोर आल्याने संचारबंदी लागू करावी लागत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
रात्री ११ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नाशिककर जबाबदारीने वागले नाहीत, तर रात्री ८, ९ किंवा १० वाजेपासून संचारबंदी वाढविली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना रोखण्याची जबाबदारी ही नाशिककरांची असून, त्यांनी खबरदारी घेणे अपेक्षित आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर आठ दिवसांतील परिस्थितीत किती सुधारणा झाली हे पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
या काळात पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रसंगी गुन्हे दाखल केले जातील. पोलीस, जिल्हा, तसेच महापालिका प्रशासनाला संचारबंदीच्या काळात कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लग्ण सोहळ्यांना होणारी गर्दी, तसेच बाजारपेठेतील गर्दी पाहता संचारबंदी लागू करण्याची वेळ आली आहे. नाशिककरांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
--इन्फो--
अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहाणार आहे. दूध वितरण, भाजीपाला, वृत्तपत्र विक्रेते, मेडिकल, दवाखाने या सेवा सुरूच राहणार आहेत. रात्रपाळीत काम करणाऱ्यांनी योग्य ती माहिती पोलिसांना देणे आवश्यक राहाणार आहे.