नायगाव : सामुदायिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली आहे. लग्न समारंभातील खर्चिक प्रथांना विरोध करून त्यांना पायबंद घालण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक बुधाजी पानसरे यांनी व्यक्त केले. वंजारी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वधू-वर सूचक मेळाव्या दरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे जिल्हा अध्यक्ष हिरामण पानसरे, उपाध्यक्ष देवराम गिते, विठ्ठल नागरे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश घुगे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिवसेंदिवस विवाह सोहळे खर्चिक बनत चालले आहेत. महागाईचा विचार करता समाजाने यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये आपल्या उपवर मुला-मुलींचे विवाह करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे पानसरे यांनी आवाहन केले. सध्याच्या विवाह सोहळ्यांमध्ये हळदी समारंभ भव्य करण्याची परंपरा सुरू झाली़ असून यात खर्च होतो. या प्रथा सर्वांनाच परवडणाऱ्या नसल्याने लग्नाच्या खर्चाने संपूर्ण कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली वावरत असल्याचे पानसरे यांनी यावेळी सांगितले. नायगावच्या पोलीसपाटीलपदी निवड झालेल्या ज्योत्स्ना पानसरे यांचा वंजारी सेवा संस्थेच्या संघटक चंद्रकला साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
‘लग्नातील प्रथा बंद करण्याची गरज’
By admin | Updated: June 6, 2016 00:02 IST