संजीव धामणे ल्ल नाांदगाव सहा महिन्यांच्या भारनियमनमुक्त कालावधीनंतर वीज वितरण कंपनीने नांदगाव शहरात ऐन उन्हाळ्यात साडेसहा तासांचे भारनियमन सुुरू केले आहे. भारनियमन काळात दुपारच्या कडक उन्हाच्या झळा नांदगावकरांच्या सहनशक्तीचा अंत बघू लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. भारनियमनामुळे वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेली पाणी व्यवस्था कोलमडली असून १० ते १२ दिवसांनी येणार्या पाण्याचे आवर्तन अधिक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांकचीं विजबिलांची थकबाकी आणि वितरण कंपनीची कार्यपद्धती या बाबी भारनियमन मुक्ततेच्या मार्गातील मोठे अडसर ठरू पाहात आहेत. भारनियमनासंदर्भात वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जयंत गेटमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वीजबिलाची वसुली कमी झाली असून, गळतीचे प्रमाण वाढल्याने भारनियमन सुरू झाल्याचे सांगितले . शहरात दोन फिडर आहेत. एक नंबर फिडरची वसुली यापूर्वी ९४ टक्के होती. तर गळती २५ टक्के होती. या महिन्यात वसुली ९१ टक्केव गळती ३८ टक्क्यांवर गेली असल्याचा दावा गेटमे यांनी केला आहे. फिडर नंबर दोनची वसुली ८५ टक्के असून, गळती ४७ टक्केअसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नं. १ वर ४३०० ग्राहक असून, मागणी सुमारे २० लाख रुपये आहे तर नं. २ वर २३०० ग्राहक असून, बिल मागणी १० लाख रुपये आहे. फिडर नं. २ च्या कक्षेत गेल्या महिन्यात चार ग्राहकांवर वीजचोरीबद्दल कारवाई करण्यात आली. परंतु फिडर नं. १ मध्ये एकही कारवाई झालेली नाही. तरीही कंपनीच्या नोेंदीत अचानक वीजगळती का वाढली? याचे ठोस कारण गेटमे यांना देता आले नाही. त्यामुळे वीजबिलाची रक्कम ग्राहकांनी मुदतीत न भरल्याने, तसेच वारंवार वीजचोरीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी भारनियमनाचे समर्थन करण्याचाच प्रयत्न केला. फिडर नं. १ ची ९० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली असताना काहीतरी खुसपट काढून भारनियमन लादण्याचा हा डाव तर नाही ना. ‘अच्छे दिन आनेवाले है’ ते हेच का, असा संशय सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होऊ लागला आहे. फिडर नं. २ च्या कक्षेत तहसील, पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा योजना अशी शासकीय व निमशासकीय कार्यालये येतात. त्यांच्या प्रतिमाह बिलांची सरासरी रक्कम एक लाख रुपये येते. लाल फित तत्त्वानुसार काम करणार्या या कार्यालयांचे बिल वेळेत अदा करण्यात येत नाही. त्यामुळे दोन नं. चा फिडर थकबाकीत जातो. ही थकबाकी सुमारे १० टक्केएवढी आहे. त्याचा भुर्दंड मात्र भारनियमनाच्या रूपाने सामान्य वीज ग्राहकांना बसतो. गळती रोखण्यासाठी व वसुली वाढविण्यासाठी नजीकच्या काळात प्रामाणिक प्रयत्न करून नांदगाव शहर भारनियमनमुक्त करण्याची ग्वाही सहाय्यक अभियंता यांनी दिली.
नांदगाव शहर अंधाराच्या वाटेकडे
By admin | Updated: May 24, 2014 12:10 IST