संजय पाठक, नाशिक- राज्य शासनाने मिशन अनलॉक घोषित केल्यानंतर नाशिकमध्ये बाजारपेठा सुरू झाल्या. स्थानिक स्तरावर कोणत्या पध्दतीने बाजारपेठा खुल्या कराव्या हहा निर्णय सर्व शासकिय यंत्रणांनी एकत्रीतरीत्या घेतल्याचे सांगितले गेले, परंतु महापालिकेने सम - विषमच्या निकषाबाबत आणि वेळेबाबत यंत्रणेतच गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका सम तर पोलीस विषम अशा दोन धु्रवांवर दोघे जण अडून राहीले. महापालिकेने दुकाने सुरू केली तर पोलीसांनी बंद केली हा गोंधळ दोन ते तीन दिवसांपासून कायम आहे.त्यामुळे व्यवसायिकही हे लॉक डाऊन की अनलॉक या संभ्रमात आहेत. कोरोनाच्या महासंकटामुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून संपुर्ण अर्थकारण ठप्प झाले आहे. उद्योग धंदे बंद, व्यवसाय बंद असल्याने आता सारेच व्यवसायिक अगतिक झाले आहेत. त्यात कुठे तरी आता शिथीलता मिळत असली तरी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे सारेच त्रस्त झाले आहे. दुकाने आणि व्यवसाय केव्हा सुरू होतील अशा प्रतिक्षेत सारेच जण आहेत. किंबहूना अधिक अगतिक झाले आहेत. आता कसेही करून व्यवसाय आता सुरू करूच द्या अशा मानसिकतेत ते आले आहेत. शासनाने हीच बाब जाणून संसर्गाचा धोका कमी होत नसताना देखील पुन्हा जनजीवन सुरूळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात यंत्रणांमधील असमन्वयाचा फटका व्यवसायिकांना बसत आहे. राज्य शासनाने निर्बंध शिथील करण्याचे अधिकार दिल्यानंतर नाशिकमध्ये ५ जून रोजी व्यापारी संघटनांची बैठक घेण्यात आली. तसेच सम- विषम पध्दतीने दुकाने सुरू करण्यास सांगण्यात आले. मात्र, कोणती दुकाने सम दिवशी चालू ठेवायची आणि कोणती विषम दिवशी याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. म्हणजे मेनरोडचाच विचार केला तर गाडगे महाराज चौकातून बघितल्यात कोणतीही दुकाने सुरू राहणार कोणती बंद हे स्पष्ट करण्यात आले नाही. काही ठिकाणी उजवी बाजूकडील सम आणि डावीकडील बाजू विषम असे सांगण्यात आले. मात्र, मेनरोडचा विचार केला तर गाडगे महाराज चौकाकडून गेले तर उजवी बाजू वेगळी आणि रविवार कारंजाकडून बघितले की, उजवी बाजू विरोधी दिशेने येते. अशा स्थितीत साऱ्याचसंभ्रमाच्या वातावरणात दुकाने सुरू झाली. आणि तुफान गर्दी उसळली. आणि सर्व दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे व्यवसायिक संतापले. हा प्रकार बाजुला आणि गर्दी प्रचंड झाल्याने जिल्हाधिका-यांनी पुन्हा लॉक डाऊनचा इशारा दिला. परंतु दुस-याच दिवशी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी बैठक घेऊन दुकानांची वेळ रात्री नऊ पर्यंंत करून दिली. हा निर्णय एकत्रीतरीत्या घेण्यात आल्याचे जाहिर केले. त्याची अंमलबजावणी सुरू होत नाही तोच त्याच दिवशी पोलीस आणि महापलिकेच्यायंत्रणेने बळजबरीने दुकाने बंद केली, त्यामुळे गोंंधळ निर्माण झाला. दुस-या दिवशी प्रशासनाचे स्पष्टीकरण आल्यानंतर देखील अजूनही हा घोळ सुरूच आहे. कोरोनाशी दोन हात करताना सर्वच शासकिय यंत्रणा एकत्रीत लढा देत आहेत. त्याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र, अन्य कामकाजात जो असमन्वय दिसत आहे तो यापूर्वी गेल्या महिन्यात देखील आढळला होता. शहरात दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर कोणती दुकाने खुली करावी आणि कोणती बंद करावी याबाबत जिल्हाधिका-यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर देखील पोलीसांनी ती बंद केली.त्यातही आधी एका रांगेतील केवळ पाच दुकाने सुरू ठेवता येतील, असे सांगण्यात आले. नंतर सर्व दुकाने खुली ठेवण्यास परवानगी तर नंतर पुन्हा सर्व दुकाने बंद असे वेळोवेळी आदेश देण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. आता दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत कायम असली तरी सम विषमचा घोळ मात्र सुरूच आहे. बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी सम आणि विषम या सामान्यत: पार्कींगसाठी वापरण्यात येणा-या पध्दतीचा वापर करण्यात आला. परंतु त्यातही घोळ आहेतकॉलेजरोड, गंगापूररोड, नाशिक पुना रोड, दिंडोरी रोड, असे जे रूंद मार्ग आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजुला होणाºया दुकांनामध्ये कितीही गर्दी झाली ती अन्य दुकानांना अडचणीची ठरत नाही, त्यांचे काय? परंतु त्यांनाही हाच नियम लागू करण्यात आल्याने अजब कारभार दिसत आहे. इतकेच नव्हे, ज्याठिकाणी रस्त्याच्याएकाच बाजुला दुकाने आहेत त्यांनाही सम विषमचा नियम लागू करण्यात आला आहे. समोर दुकाने नाही किंवा मोकळे भूखंड अथवा शासकिय कार्यालय आहे, त्याच्या समोरील दुकांनाना हाच नियम सक्तीने लागु करून मनपा कर्मचा-यांनी त्यांच दुकानाबाहेर स्टीकर्स लावले आहेत. त्यामुळे एकुणच यंत्रणेची काम करण्याची सरकारी पध्दत वारंवार अधोरेखीत होते,त्यातून व्यवहार्य निर्णय घेण्याची गरज असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. अर्थात हे सर्व नियमांचे पालन करणा-या पापभिरूदुकानदारांच्याबाबतीत झाले. ज्यांनी ना यंत्रणेच्या परवानगीची वाट बघितली ना कोणते नियम पाळले अशांवर काही कारवाई झाली नाही तो भाग वेगळाच!