घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव मोर, धामणी, अधरवड या गावांच्या सहकारी सोसायटीचे सचिव गेल्या वर्षभरापासून गायब आहे. परिणामी प्रत्येक सोसायटीचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. वारंवार सचिवाची मागणी करूनही नाशिक येथील जिल्हास्तरीय समिती अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने तिन्ही गावच्या सोसायटी अध्यक्षांसह शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकांनी आमच्यावर अरेरावी करून दमदाटी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शेकडो शेतकऱ्यांच्या हितासाठी निगडित असणाऱ्या सोसायटीमध्ये सचिव नसल्याने शेतकऱ्यांसह पदाधिकारी नवीन सचिव मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करीत आहेत. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर, धामणी, अधरवड येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये विजय बोराडे यांना सचिव म्हणून नेमणूक देण्यात आलेली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून ते गायब आहेत. परिणामी तिन्ही गावातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी मिळणारे कर्ज व इतर व्यवहार थांबले आहेत. शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी तिन्ही गावातील शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी वर्षभरापासून नवीन सचिव द्यावा या मागणीसाठी नाशिक येथील शासनाच्या जिल्हास्तरीय समितीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. (वार्ताहर)सचिव मिळेपर्यंत कार्यालयातचसोमवारी पिंपळगाव मोर सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ काळे, अधरवड सोसायटीचे चेअरमन नवनाथ बऱ्हे, धामणीचे चेअरमन रंजना भोसले, माजी चेअरमन राजाराम काळे, जगन बेंडकोळी, रामकृष्ण बऱ्हे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, दत्तू काळे, शिवाजी काळे, धनाजी भोसले, कांतिलाल भोसले, सुदाम भोसले आदि शेतकऱ्यांनी नाशिकच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कार्यालयीन अधीक्षकांनी दुरुत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी तिन्ही गावाला नवीन सचिव मिळत नाही तोपर्यंत कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: March 28, 2017 23:54 IST